Onion News | आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे सरकार थांबवणार कांद्याची नासाडी?


Onion News | नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा असून आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठा बाजारपेठ लासलगाव बाजारसमिती ही देखील नाशिक जिल्ह्यात आहे. मात्र कांदा पिक घेण्यासाठी शतेकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते कारण कांदा हे पीक लवकर खराब होते. यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कांदा पिके नष्ट होतात.

एका संशोधनानुसार, किमान ३० टक्के पीक देखभालीदरम्यान वाया जात असते. त्यामुळे आता सरकारला कांद्याची पावडर बनवायची असून त्यावर इरॅडिएशनने उपचार करून त्याचे आयुष्य वाढवायचे असून हे उपचार कांद्याला अंकुर येण्यापासून प्रतिबंधित करते आणि ज्यामुळे त्याचे शेल्फ लाइफ वाढते. आता या संदर्भात सरकारला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन आपली नासाडी थांबवायची असून या प्रयत्नामुळे 11 हजार कोटी रुपयांची बचत होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

साठवणुकीत ठेवलेला हजारो कोटींचा कांदा हा सडल्याने वाया जातो. ही नासाडी थांबवण्यासाठी सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेत असून खरीप हंगामातील कांदे ठेवण्यास योग्य नाहीत कारण त्यांचे शेल्फ लाइफ खूपच कमी असते. तर रब्बी हंगामातील कांदे साठवण्यासारखे असतात आणि मे महिन्यात निघणारा कांदा डिसेंबरपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु दुर्दैवाने, हिवाळ्यात पेरलेल्या सुमारे एक चतुर्थांश कांदा पारंपरिक साठवण सुविधांमुळे खराब होत असतो. ज्याला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे थांबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Onion News
Onion News

Onion News | इंटरनेट ऑफ थिंग्जद्वारे डेटा संकलित केला जाणार

आता कांदा साठवणुकीत होणारी कांद्याची नासाडी थांबवण्याकरीता इंटरनेट ऑफ थिंग्जद्वारे डेटा संकलित केला जाणार असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कांदा सडणे आणि सुकणे याची माहिती सेन्सरद्वारे उपलब्ध होणार आहे. एवढेच नाही तर 100 च्या बॅचमध्ये ठेवलेला कोणता कांदा चांगला आहे? तसेच कोणता कांदा खराब होत आहे? हे कळण्यास मदत होईल. याद्वारे इतर कांदे खराब होण्यापासून वाचवता येतात.

एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारला कांद्याला वाया जाण्यापासून वाचवायचे असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकार गोदामांमध्ये ठेवलेल्या कांद्याची खरी आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सडलेला कांदा वेळेत दुकानातून बाहेर काढला तर त्यामुळे साठवणुकीत ठेवलेला कांदा सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे. दरम्यान, जेव्हा-जेव्हा बाजारात कांद्याचे भाव वाढतात तेव्हा किरकोळ बाजारातील भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकार कांदे बाजारात पाठवते. कांदा खराब झाला नाही तर महागाईही कमी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.