Farmer Protest | शेतकरी आणि मोदी सरकारमधील पेच का सुटत नाही?


Farmer Protest | देशातील अन्नदाता हा पुन्हा आक्रमक झाला असून, त्याने सरकारच्या विरोधात आंदोलनाची हत्यार उपसले आहे. हमीभावाचा कायदा आणि यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशातील शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. याआधी २०२०मध्ये शेकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दिल्लीची कोंडी केली होती. देशातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पारीत करण्यात आलेल्या तीन कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले होते.

मात्र, त्यावेळीही शेतकऱ्यांसमोर सरकारला माघार घ्यावी लागली होती. त्यानुसार ते कायदे मागे घेण्यात आले होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप करत देशातील शेतकरी हे आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या सीमांवर येऊन ठेपले आहेत. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे आंदोलन उभं राहिलं तर मोदी सरकारला लोकसभा निवडणूकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनांची नेमकी मागणी काय आहे? शेतकरी आणि मोदी सरकार यांच्यातील हा पेच का सुटत नाही? याबाबत सविस्तर… (Farmer Protest)

Farmer Protest | अनेक शेतकरी जखमी

लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. तर, काही शेतकरी हे आधीच दिल्लीच्या सीमांवर येऊन धडकले आहेत. पंजाब – हरियाणाच्या ‘शंभू बॉर्डर’वर शेतकरी व पोलिस यांच्यात काल वाद झाले. यादरम्यान, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य लाठीचार्ज केला. यात अनेक शेतकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भागांतील परिस्थिती चिघळू नये म्हणून हरियाणातील १२ तर, राजस्थानमधील ३ जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तब्बल २०० शेतकरी संघटना या दिल्लीच्या सीमेवर आंदोलनासाठी जमले आहेत.

प्रशासनाची सावधगिरी…

  1. शेतकरी नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.
  2. शेतकऱ्यांचे नेते सुरजीत फुल व रणदीप मान यांचे एक्स (ट्वीटर) अकाउंट सस्पेंड करण्यात आले.
  3. दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आला आहे.
  4. शेतकऱ्यांना १० लिटरपेक्षा जास्त डिझेल किंवा पेट्रोल न देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
  5. हरियाणात १२ जिल्ह्यात इंटरनेट सेवा सेवा खंडित करण्यात आली आहे.
  6. दिल्लीच्या सीमांवर पुन्हा एकदा सिमेंटचे बॅरिकेट्स व खिळे ठोकण्यात आले आहेत.
  7. हरियाणा आणि पंजाबच्या शंभू, आणि खनौरी यासह मागील आंदोलनांचे केंद्र ठरलेल्या सिंघु व टिकरी या सीमांवरही सीमेंटचे बॅरिकेट्स लावलेले आहेत. (Farmer Protest)

Farmers Protest | शेतकऱ्यांवर बळाचा वापर; अश्रुधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या ?

  1. शेतकऱ्यांच्या सर्व शेत मालांना हमीभाव देणारा कायदा करण्यात यावा.
  2. ‘स्वामीनाथन आयोगा’च्या शिफारशी लागू करण्यात याव्यात.
  3. शेतकरी व शेतमंजूरांना कर्जमाफी करावी.
  4. ‘भुमीअधिग्रहन कायदा २०१३’ हा पुन्हा लागू करावा.
  5. लखीमपूर खिरी येथे घडलेल्या घटनेत जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत व सरकारी नोकरी दिली जावी.
  6. ‘मुक्त व्यापार करार’ रद्द करावा.
  7. ‘वीज विधेयक २०००’ तातडीने रद्द करावे.
  8. मसाल्याच्या पदार्थांसाठी ‘राष्ट्रीय आयोग’ तयार केले जावे.
  9. संविधानाची ५ वी सूची लागू करावी आणि आदिवासी समाजबांधवांच्या जमिनीची लूट थांबवावी.
  10. नकली बियाणे, कीटकनाशके, खतांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कायदा तयार करावा.

Farmers Protest | शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानेच राजधानी बिथरली

या मागण्या मान्य…

  • मागील शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान शेतकरी व तरूणांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जाणार
  • लखिमपुर खीरी येथील घटनेत जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना मदत करणार
  • ‘वीज कायदा 2020’ रद्द करण्याबाबत सरकार सकारात्मक (Farmer Protest)