PM Kisan Yojna | राज्यातील 96 लाख लाभार्थी पात्र असताना योजनेचा लाभ नाही; नेमकं कारण काय?


PM Kisan Yojna | PM किसान आणि नमो किसान महासन्मान या योजनेतून एकही पात्र लाभधारक वंचित राहणार नसल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

PM Kisan Yojna | अल्प किंवा अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली असून २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य केंद्र सरकारकडून दिले जाते.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून महाराष्ट्रातील एकही पात्र लाभधारक वंचित राहणार नसल्याचे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं असून यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील आहे. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत माहिती दिली आहे. 

PM Kisan Yojna | राज्यातील सुमारे 96 लाख शेतकरी पात्र

पीएम किसान या योजनेसाठी महाराष्ट्रातील सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले असताना राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली होती. परंतू, ई केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते आधार कार्डसोबत लिंक करणे अशा काही अटींची पूर्तता न झाल्याने पात्र लाभधारकांपैकी 12 ते 13 लाख शेतकरी अजूनही लाभापासून वंचित राहिलेले होते.

या योजनेच्या १४ व्या हफत्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात घेत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कृषी, महसूल आणि भूमिअभिलेख अशा विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे 6 लाख शेतकऱ्यांच्या वरील अटींची पूर्तता करण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना आणि राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेमधील राज्यातील एकही पात्र लाभधारक वंचित राहणार नाही यादृष्टीने कृषी विभाग काम करत असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिलेली असताना आता महाराष्ट्रातील या लाभार्थ्यांना कधी पर्यंत या योजनांचा लाभ मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.