Maharashtra | सरकारने केलं टास्क फोर्सचं पुनर्गठन; आतातरी शेतकरी आत्महत्या थांबतील का?


Maharashtra | सध्या नागपुरमध्ये महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अनेक मुद्दे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिने कळीचा विषय बनलेले आहे. यातच काल झालेल्या सत्रात सध्या शेतकऱ्यांना भासत असलेल्या समस्या यावर विरोधी पक्षाने आवाज उचलला. दरम्यान, राज्याच्या अनेक भागात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि एकंदरच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली असताना त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

राज्याच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपुर्वी दुष्काळ, अवकाळी पाऊस तसेच गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला असताना आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलं आहे. या सरकारने गेल्या दीड वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तब्बल 44 हजार 278 कोटी रुपयांची विक्रमी मदत केली आहे अशी माहिती विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ मिशन झाले फेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ मिशनची सुरुवात केली होती मात्र हे मिशन पुरते फेल ठरले आहे. यामागील कारण म्हणजे २०२३ या वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात २४७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आता ह्या आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टास्क फोर्स नेमणार असल्याचं जाहीर केलं आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय होत असून एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली तरी ती आत्महत्या दुख:द असते, असे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या टास्क फोर्स मध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, कृषी प्राध्यापक, ज्येष्ठ संपादक, निवृत्त पोलीस, अधिकारी, एनजिओ, तसेच कीर्तनकार यांची मदत घेणार आहे. आतातरी या टास्क फोर्समुळे काहीप्रमाणात शेतकरी आत्महत्या थांबतील असा सवाल उपस्थित होत आहे.

Maharashtra | शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं केलं पुनर्गठन

महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन येत्या २-४ दिवसांत समाप्त होऊ शकते यातच काल विधानसभेत शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक घोषणा केल्या असून यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शेतीला शाश्वत शेतीकडे कसं नेता येईल याबरोबरच राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल? अवकाळी पाऊस आला किंवा दुष्काळ पडला तरी शेतीचं नुकसान कसं होणार नाही? याप्रकारचं शेतीचं मॉडेल कसं विकसित करता येईल, यासर्व बाबींसाठी हा टास्क फोर्स काम करणार आहे.