Health Tips | हिवाळा आणि आरोग्य..हिवाळ्यात कशी घ्यावी आरोग्याची काळजी?


Health Tips | संपूर्ण वर्षभरात सर्वांत चांगला ऋतू कोणता? असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे साधे-सरळ उत्तर म्हणजे हिवाळा ऋतू आणि विसर्गकाळातील शिशिर तसेच हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळा. हिवाळा हा ऋतू पुढच्या संपूर्ण वर्षातील आरोग्याची पायाभरणी करणारा असतो असे म्हटले जाते. मात्र ही पायाभरणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे भाग असून आहार, व्यायाम, उपचार अशा प्रकारे तिन्ही बाजूंनी हिवाळ्यात आवश्‍यक ते बदल केले, तर हिवाळ्याचा आनंदही घेता येऊ शकतो.

हिवाळ्यामध्ये शरीरस्थ अग्नीला निसर्गतः शक्ती मिळत असते म्हणून हिवाळ्यात भूक चांगली लागते आणि पचनही व्यवस्थित होते. या ऋतूत गोड, आंबट आणि खारट चवीच्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा. त्यातही मधुर रस (गोड चव) शरीराचे पोषण करण्यासाठी सर्वश्रेष्ठ असल्याने विशेषतः या ऋतूत गोड खावे. मुख्य जेवणात धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यापासून तयार केलेले विविध प्रकार, डाळी आणि कडधान्यांपैकी मूग, तूर तर उत्तमच, परंतु हेमंत ऋतूत मसूर, मटकी तसेच प्रकृतीला अनुकूल असल्यास हरभरा, उडीद, चवळी ही कडधान्येही खाता येत असतात.

भाज्या कोणत्या खाव्यात?

भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, दोडका, घोसाळी, पडवळ, बटाटा, टिंडा, भेंडी, पालक, मेथी या भाज्या नित्य वापरण्यास योग्य असतात. तर वांगे, सिमला मिरची, घेवडा, वालाच्या शेंगा या भाज्या अधूनमधून खाऊ शकतात. आमटी, भाजी वगैरे बनविताना जिरे, हिंग, धणे, मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, वेलची, हळद, कोकम, आले, लसूण अशा मसाल्यांचा योग्य प्रमाणात वापर करता येत असतो.

सुका मेवा ठरतो आरोग्यकारी..

हिवाळ्यात काकडी, टोमॅटो, गाजर, बीट यांची दही घालून कोशिंबीर करता येते. तसेच चवीसाठी ताजी हिरवी चटणी, लोणचे, पापड खाता येतात, ऋतूनुसार बाजारात मिळणारी उत्तम फळं, सुक्या मेव्यापैकी बदाम, खजूर, खारीक, काजू, अंजीर, मनुका, जर्दाळू, अक्रोड उचित प्रमाणात खाणे योग्य असते. लाडू, बर्फी, खीर, खोबऱ्याची वडी, डिंकाचा लाडू, दुधी हलवा, साखर-केशरी भात असे गोड पदार्थ खाण्यात समाविष्ट करता येऊ शकतात.

Agriculture News | चक्रीवादळ निवळल्यानंतरही राज्यात ढगाळ हवामान; कशी घ्याल रब्बी पिकांची काळजी?

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?

हिवाळ्यात त्वचेची काळजीसुद्धा विशेषत्वाने घ्यावी लागते. कारण थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचासुद्धा कोरडी रखरखीत होत असते म्हणुन सुरुवातीपासून नीट काळजी घेतल्यास त्वचा निरोगी ठेवता येऊ शकते. थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग स्नान होय. रोज रात्री झोपण्यापूर्वी तेल लावले तर त्वचेला आतून-बाहेरून आवश्‍यक ते सर्व पोषण मिळत असते आणि म्हणुन नियमित अभ्यंगाइतकाच दुसरा प्रभावी उपाय म्हणजे उटण्याचा वापर करावा.

उटण्यामध्ये अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा, हळद, दारुहळद अशा अनेक उत्तमोत्तम वनस्पतींचे मिश्रण असते तसेच ज्या त्वचेला स्वच्छ तर करतातच मात्र त्वचेवरील दोष दूर करण्यासही समर्थ असतात. उटण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे त्वचेला उचित स्निग्धता मिळत असून वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो. सॅन मसाज पावडरसारखे उटणे या दृष्टीने उत्तम उपाय मानला जातो.

हिवाळ्यात उटणे लावताना किंवा मुखलेप लावताना त्यात पाण्याऐवजी दूध किंवा दुधाची साय टाकण्याचा अधिक उपयोग होऊ शकतो आणि अभ्यंग, उटणे, या प्रकारचे विशेष लेप यांची व्यवस्थित योजना केली तर हिवाळ्याचा दुष्परिणाम त्वचेला भोगावा लागणार नाही हे निश्र्चित असते. हिवाळ्यामध्ये तळपाय विशेषतः टाचांना भेगा पडणे तसेच शरीरात अतिरुक्षता वाढल्याने भेगांमधून रक्त येणे या सुद्धा तक्रारी आढळतात.